लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 16 February 2020

ती पहिली रात्र

आई, माझा हा एकविसावा वाढदिवस आहे. तो नक्की खास झाला पाहिजे." लेकीने फर्मान काढले.

तसा आजवर कोणता वाढदिवस खास झाला नाही ग असे तोंडापर्यंत आलेले वाक्य परत वादाला तोंड नको म्हणून तसेच गिळून घेतले.

"आता काय खास करायचं आहे ते देखील सांगून टाक ना."

तिला हवा असलेला प्रश्न मी विचारला.

“आई, तुम्हाला सरप्राईज असे काही देताच येत नाही. तूच सांग बरं मी अगदी लहान असल्यापासून काय मागतेय ते?" लेकीने मलाच प्रतिप्रश्न केला.

“कुत्र्याचं पिल्लू? नाही ग बाई, तेवढे सोडून काहीही माग. तुला माहिती आहे की मला सर्व कीटकांची आणि प्राण्यांची खूप भीती वाटते. तुम्ही सगळे निघून जाल आपापल्या कामांना आणि ते पिल्लू येईल माझ्याच गळ्यात. अजिबात नाही." मी अगदी निक्षून सांगितले.

खरेतर कुत्र्यांची मला एवढी भीती का आहे मलाच कळत नाही. बाहेर गेल्यावर रस्त्यावर कुठेही कुत्र्याने मला पाहिले की ते माझ्याच मागेमागे येत आहेत असे वाटू लागते. मग माझा खूप गोंधळ उडतो. मला सारखे वाटू लागते की हे कुत्रं मला चोर समजून चावणार तर नाही ना? हातात पिशवी असेल काही खायचे आहे समजून अंगावर धावणार तर नाही ना? त्यामुळे दूरवर कुठेही कुत्रं दिसले रे दिसले कि मी खूप सैरभैर होते. कारण भराभर चालावे तर तेही जोरात मागे येण्याची भीती आणि हळूहळू चालावे तर पटकन चावायची भीती!!! खरतर सर्व माझी टिंगल करतात, पण आहे मला भिती, काय करू? त्यामुळे घरात पिल्लू येणे शक्यच नव्हते.

माझा ठाम विरोध पाहून लेकीचा चेहरा खूप हिरमुसला.

मी तिला परत समजावले," तुला  तुझ्या मनाप्रमाणे कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला पाठवतो आहोत ना? मग आता पिल्लू आणण्याचा हट्ट सोडून दे."

लेक कशीबशी  गप्प बसली. पण तिची  नाराजी वाढदिवसाच्या आदल्या रात्री पर्यंत तशीच होती.

खरंतर तिला प्राण्यांविषयी भयानक म्हणता येईल असे प्रेम आहे. कित्येकदा ती  रस्त्यावरची  पिल्ले उचलून आणत असते आणि मी मात्र तिला ते कोणालाही द्यायला लावते.

त्यामुळे  तिचे नाराज होणे स्वाभाविक होते.

ह्यावेळी मी विचार केला की जाऊ दे, लेक आता एकवीस पूर्ण झाली आहे, चार पाच वर्षांत लग्न होऊन सासरी जाईल. नंतर तिचा हा एकमेव हट्ट आपण पूर्ण न केल्याची खंत मनाला राहील. तेव्हा ह्या वाढदिवसाला तिला पिल्लूच भेट देऊ.

झालं, मी तयारी दाखवल्याबरोबर लेकीच्या वाढदिवसाला सकाळी सकाळी आमच्याकडे बिगल जातीच्या पिल्लाचे आगमन झाले. लेक तर सरप्राईज बघून आनंदाने हुरळून गेली. बरं, एवढं करून मी गप्प बसायचे ना? पण लेकीवरच्या अती प्रेमापायी मी तिला जोरात म्हटले, " तू कुत्र्यांचे प्रशिक्षण घ्यायला जाशील तेव्हा पंधरा दिवस मी सांभाळ करेन पिल्लाचा. माझ्याकडून तुला ही अजून एक भेट". लेक प्रेमाने गळ्यात पडली. लेकीला झालेला आनंद पाहून मन समाधानाने भरून पावले.

यथावकाश पिल्लाचं ‘चेरी’ म्हणून नामकरण झाले.

चेरीचा वावर घरभर होऊ लागला तसे आपण काय करून बसलो ह्याची जाणीव झाली. ती सारखी इकडून तिकडे पळून धिंगाणा घालू लागली. चेरीने माझ्याकडे नुसते पाहिले तरी मी धूम ठोकायचे. मला पळताना पाहून ती अजून जोरात माझ्या मागे  लागायची. मी अजूनही पळू शकते हे चेरीनेच मला दाखवून दिले. बर, एवढ्या मोठ्या घरात तिला मला सोडून इतरांच्या मागे लागायला काय हरकत होती? पण मी दिसली कि ती जोरात माझ्याकडे येणार!

लेक मला समजवायची,” आई, ती प्रेमाने येते ग, ती खरंच तुला काहीच करणार नाही. तिला फक्त तुझ्याशी खेळायचे असते. एकदा बघ ना ती किती निरागस आहे.” भीतीपुढे मला ना चेरीचे निरागस डोळे दिसायचे, ना तिचे खेळणे दिसायचे. तिला बघून जाणवायची फक्त भीती, भीती आणि भीती. लेक मात्र तिचे शी शू पासून सर्व अगदी मनापासून करत होती.

बघता बघता लेकीची हैद्राबादला प्रशिक्षणाला जायची वेळ आली. चेरीला सांभाळण्याच्या भीतीने पोटात गोळा आला होता. सर्व सूचना देऊन लेक रवाना झाली.

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र.... आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर.....एकदम सुरक्षित!!!

पण झोपायची वेळ होताच तिने रंग दाखवायला सुरवात केली. तिला काहीही करून दिवाणावरच यायचे होते. आधी तिने बारीक आवाजात रडका सूर लावून बघितला. मी दाद देत नाही म्हटल्यावर ती माझ्याकडे बघून भुंकायला लागली. तिची नजर खूप भेदक वाटली. वाटले की आता केव्हांही आपल्यावर हल्ला होऊ शकतो.

मी तिला जीव तोडून सांगत होते,” बाळा, मला तुझी भीती वाटते ना, मी तुला उचलून नाही घेऊ शकत ग!”

पण त्या बिगलच्या लांब लांब कानांमध्ये काही माझा आवाज शिरत नव्हता. तिचे आपले रडणे, भुंकणे चालूच. आता ती खूप चिडली तर रागात दिवाणावर चढेल ह्या भीतीने मला घाम फुटला. मी उशी तोंडावर घेऊन तिची नजर टाळत जोरजोरात सर्वांना बोलावले. काय झाले म्हणून घरातले सर्व दाराजवळ आले तर दरवाजा उघडेचना...चुकून माझ्याकडून दरवाजा लॉक झाला होता. म्हणजे मला दिवाणावरून खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आता आपले काही खरं नाही असे वाटू लागले. शेवटी सर्व धीर एकवटून उशीची ढाल बनवून कसाबसा दरवाजा उघडला. मुलाने मांडीवर घेतल्यावर चेरी पटकन झोपली.

पण मला झोप कुठे लागते? सतत कानांत चेरीचा आवाज घुमत होता. ती आपल्याला चावायला आली आहे असे वाटून धडधड होत होती. मध्येच दचकायला होत होते. ह्या घाबरण्यातच नेमके माझे पांघरूण धपकन खाली पडले आणि चेरी परत उठून बसली.

परत तिची तशीच चुळबूळ सुरु झाली. आता परत घरातल्यांची झोप मोडायला नको म्हणून मी दुरूनच तिला झोपवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात अचानक विचार आला की जसे लहान मुलांना झोपवायला अंगाईगीत असते तसे आता प्राण्यांसाठीही काही गाणी असतीलच. मग लगेच गुगल वर शोध घेतला आणि गाणे मिळवले. त्या गाण्याने मी पेंगले पण ती काही झोपायलाच तयार नव्हती. आता तिला मांडीवर घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

लेकीचे सर्व बोलणे आठवले. तिने सांगितले होते, “आई, पिल्लू जेव्हा खाण्याच्या आणि झोपेच्या मूड असते ना तेव्हा मस्ती करून चावत नाहीत. तसेच कुत्रं जेव्हा शेपूट हलवत जवळ येतं तेव्हा ते प्रेमाने जवळ येत असते. त्यामुळे तू उगाचच घाबरत जाऊ नको. लहान पिल्लू आपल्याला कधीच चिडून चावत नसतं. ते आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतं.”

सगळं काही आठवून चेरीचे लक्षणे तपासली. ती शेपूट हलवत भुंकत होती आणि झोपेच्या मोडमध्ये गेली होती.

मग खूप खोल श्वास घेतले आणि मनाचा धीर करून मोठं जाड पांघरूण पायांवर घेऊन खाली बसले. ती जोरात येऊन मांडीत बसली आणि माझ्या कुशीत शिरून लगेच गाढ झोपली. मी जीव मुठीत घेऊन घामाने चिंब भिजले होते. पण अजिबात हलले नाही. कारण माझ्या हालचालीने ती परत मस्तीच्या मोडमध्ये जाण्याची भीती होती. पण चेरीच्या त्या स्पर्शाने मी उभा केलेला भीतीचा बागुलबुवा कुठच्या कुठे पळून गेला. मग वाटले की अरे इतकी सोपी गोष्ट होती ही आणि आपण किती मोठा भीतीचा डोंगर उभा केला होता. अखेर तिला हळूच खाली झोपवलं आणि मी देखील झोपेच्या अधीन झाले. अशाप्रकारे चेरीची आणि माझी ती पहिली रात्र यशस्वीपणे पार पडली.

सौ. मंजुषा देशपांडे, पुणे. 












Saturday, 15 February 2020

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द  बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत  मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच  दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
 त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.

Saturday, 18 January 2020

कोषांकित ते वलयांकित



आज सर्वांना मी एक गोड बातमी सांगणार आहे. इश्श्य !!! तशी गोड बातमी नाही काही!!!
तर नुकतेच मला भारती विद्यापीठाच्या विवाहपूर्व आणि वैवाहिक समुपदेशनाच्या ( Pre marital-marital counselling ) कोर्स मध्ये रौप्य पदक मिळाले. माझी अवस्था तर ‘आनंद पोटात माझ्या माहिना’ अशी झाली. त्यामुळे त्यावर लेख लिहूनच माझ्या सर्व सोशल मिडीयाच्या मित्र मैत्रिणींना ही आनंदाची बातमी शेअर करायचे ठरवले. वास्ततविक ही काही खूप जगावेगळी गोष्ट आहे असे अजिबात नाही. तरीही मला खूप खूप आनंद का झाला त्यामागच्या कारणांविषयी मी थोडा विचार केला आणि उत्तर मिळाले. हे उत्तर असे आहे की ते माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना लागू होऊ शकते म्हणून शेअर करायचे आवश्यक वाटले.
खरंतर मी लहानपणापासून अभ्यासात चांगली म्हणण्या इतपत नक्कीच होते. पण स्पर्धांमध्ये भाग घेणे, स्टेजवर जाऊन बोलून येणे या बाबतीत मात्र मी फार मागे मागे असायचे. फारसे कोणाशी बोलणे नाही, उत्तर येत असूनही पटकन हात वर करणे नाही आणि कधी कशात भाग घेणे नाही. माझ्या शाळेतील आणि महाविद्यालयातील मित्र-मैत्रीणीना हे नक्की आठवत असेल. जेव्हा इतर मुलंमुली विविध स्पर्धा गाजवून बक्षिसे आणायचे तेव्हा त्यांचा खूप हेवा वाटायचा. आपणही भाग घ्यावा असे खूप वाटायचे पण कधी हिंमतच झाली नाही. त्यामुळे कधी मेडल वैगरे मिळण्याचा प्रश्नच नाही आला.
चाळीशीच्या उंबरठ्यावर मात्र आपण काही करू शकलो नाही याची खंत मनाला वाटू लागली. माझ्या असे लक्षात आले की लहानपणापासून मी नकळतपणे स्वतःभोवती एक न्युनगंडाचा कोश ( Inferiority complex)  विणत गेले आहे. आपल्याला जमणार नाही, आपल्यावर सर्व हसतील, आपली इमेज खराब होईल अशा अनेक नकारात्मक धाग्यांनी स्वतःला वेढून घेतले होते. जसजसे मोठी होत गेले तसे हे कोशाचे आवरण अधिकच घट्ट होत गेले. बरं हे माझ्याभोवतीचे कोष कोणाला दिसतही नव्हते. कारण मला सर्व माझ्या कोशांसहितच ओळखत होते. कोणाला कसे कळणार होते की मी काय काय करू शकते.
जेव्हा हा  न्युनगंडाचा कोश मनाला आणि शरीराला खूप टोचू लागला तेव्हा मी ठरवले की हा आपण विणलेला कोष आपणच काढला तरच निघेल. त्या साठी कोणाची वाट बघत बसलो तर तो कधी निघणारच नाही. मग मात्र कोशाचा एकेक धागा काढायला सुरवात केली आणि मनातल्या सर्व सुप्त इच्छा पूर्ण करायला सुरवात केली. आधी बी. कॉम केलेले होते. पण मानसशास्त्र शिकायची खूप इच्छा होती. मग प्रथम बी.ए. मानसशास्त्र विशेष श्रेणीत पूर्ण करून एम. ए. साठी मॉडन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथे मात्र प्रथमच ppt प्रेझेंटेशन, केस प्रेझेंटेशन अशा गोष्टींचा अनुभव घेत एम. ए. मानसशास्त्र (Counselling psychology) प्रथम श्रेणीत पूर्ण केले. मग मात्र स्वतः विषयीचा आत्मविश्वास वाढू लागला.
ह्यासोबत कथा, कविता, लेख , निबंध लिहिणे चालू केले होते. त्यामध्ये मिळालेल्या बक्षिसांनी हुरूप आला. त्यातूनच साहित्य संगम नावाचा ब्लॉग सुरु झाला. ह्या ब्लॉग विविध विषयांवर लिहून अगदी मनोसक्त व्यक्त होत असते.
एम.ए. झाल्यावर aptitude test, करिअर मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन असे सर्व चालू होते. पण त्यात ही कोणत्या तरी एका गोष्टीवर एकाग्र होऊन काम करावे असे वाटू लागले. मग वैवाहिक समुपदेशनाच्या ह्या स्पेशल कोर्ससाठी थेट भारती विद्यापीठ गाठले. ह्या कोर्स मध्ये पण तोंडीं परीक्षा, लेखी परीक्षा, रोल प्ले आणि केस सादरीकरण असे सर्व काही होते. जवळजवळ ४७ लोकांनी प्रवेश घेतला होता. त्यात यशस्वी होऊन मेडल मिळाले. त्यातही वयानुसार झालेली गंमत म्हणजे मेन नोट्स ज्यामध्ये होत्या त्याविषयी मी पूर्णपणे विसरून गेले. मग काय संपूर्ण पेपर मनाने लिहिला. तसे बघायला गेले तर हा कोर्स आणि मिळालेले मेडल ही  काही फार मोठी घटना आहे असे अजिबात नाही. पण आपण आपल्यातल्या कमतरतांवर मिळवलेला विजय आपल्यासाठी खूप मोठा असतो. सामाजिक दृष्ट्या भलेही मी काही कोणी मोठी व्यक्ती नसेल, पण माझ्या नजरेत मी मोठी झाले आहे याचा खरं तर हा आनंद आहे.
अशा प्रकारे एकेका कोशातून हळूहळू मुक्त होत मी माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून जोमाने कामाला सुरवात केली आहे.आता स्वतःच्या  संसाराचे मार्गक्रमण करताना विवाहपूर्व-वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशनातून  इतरांना मदत करणे सुरु आहे.माझ्या या सर्व प्रवासात माझ्या सर्व भासी आभासी जगातील हितचिंतकांचे माझ्या सोबत असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे असल्याने ही मेडलची गोड बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर केली.
थोडक्यात काय तर आपणच आपल्याभोवतीचे पक्के केलेले न्युनगंडाचे कोष स्वतःलाच शोधावे लागतात. कोश सापडले की त्यातून मुक्त होण्याचा मार्गही आपोआप गवसतो. ह्या कोशांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या आयुष्याला केंव्हाही वेढा घालून आयुष्यात गुंता निर्माण करत असतात. कधी कधी असेही होते की शाळा- महाविद्यालयात खूप नाव कमवणारे पुढे अचानक आत्मविश्वास हरवून बसतात. त्यांच्यात स्वतः विषयी न्युनगंड निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा असे वाटत असेल तेव्हा प्रथम स्वतःचा अभ्यास करावा आणि कोशांचे आवरण काढायला सुरवात करावी.
हे सर्व कोश काढण्यात जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपोआप स्वतःभोवती एक वलय निर्माण होऊ लागते. हे वलय आपल्या स्वतःला  आनंद, उत्साह आणि प्रेरणा तर देतेच, पण इतरानाही ते दिसू लागते  किंवा त्याची जाणीव होते. मग ते वलयच आपली आपल्याशी आणि सर्व जगाशी ओळख निर्माण करत असते. फक्त त्यासाठी आपण स्वतःला कोशमुक्त ठेवले पाहिजे.
 मला मिळालेल्या ह्या मेडल ने मी कोषमुक्त झाल्याचे सिध्द केले आहे. त्यामुळे त्याचा मला अगदी मनापसून खूप आनंद झाला आणि हा आनंद सर्वांबरोबर शेअर करून तो मी कैकपटीने वाढवत आहे. आता कोश मुक्त्ततेतून वलयांकित  होणाऱ्या माझ्या जीवन प्रवासाला तुमच्या शुभेच्छा तर हव्यातच.

@ - Manjusha Deshpande, Pune.