लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Sunday, 1 December 2019

माझा बबड्या


त्या अग्गंबाई मधील बबड्यामुळे माझ्या डोक्यात वेगळाच किडा वळवळू लागला. तो बबड्या शब्दच  खूप गोड वाटू लागला. अरे यार, आपल्यालाही कोणीतरी बबड्या म्हणावे असे उगीचच वाटू लागले. पण आपल्याला असे बबड्या म्हणणारे कोणी उरलेच नाही. अर्थात आता पन्नाशीत अशी अपेक्षा करणे कोणाला हास्यास्पद वाटू शकेल. पण वाटले त्याला काय करणार. त्या बबड्याने मला अस्वस्थ केले हे खरं!!! मालिकेतील तो बबड्या कसा आहे ह्याच्याशी मला काही घेणेदेणे नव्हते. 
बरं हा वयाचा बुरखा कोणाला कसे सांगणार होता की मला बबड्या म्हण ना...नाहीतर राजा, सोन्या, राणी, बेटा असे काहीही चालेल.....छे, हे वय ना जिथे तिथे नडतं!!!
खरं तर वय हा फॅक्टर शरीराशी संबंधित आहे. लहानपण...तरुणपण...मोठेपण.. ह्या सर्व शारीरिक अवस्था आहेत. मन कसे कायम चिरतरुण असते. पण शारीरिक वय वाढले की ते वय नकळत मनावर लादले जाते. आपण त्या मनालाही उगीच सो कॉल्ड मॅच्युअर्ड करत मोठेपणाच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. पण त्या बबड्या नावाने माझ्यातल्या बालीश मनाला जागे केले आणि लाडिक हाक ऐकायला कान आसुसले. पण आई-वडील नसताना तर ही हाक ऐकणे मुश्किलच होते. अशावेळी आत्याची पण खूप आठवण झाली. कायम राजा, बेटा म्हणणार्‍या माझ्या आत्यानेदेखील या जगाचा निरोप घेतला. काय करावे कळत नव्हते.
मग एकदम क्लिक झाले की अरे आम्ही मैत्रिणी तर जवळपास सारख्याच वयाच्या आहोत. चला तर आता निदान ग्रुप मध्ये तरी जाहिर करावे की आपण आता एकमेकींना मस्तपैकी सोनू, मोनू, बेटा, रानी, राजा आणि बबड्या म्हणायचे. पुरे झाला आता तो मोठेपणाचा आव. कल्पनेनेच मन अगदी हलकेफुलके झाले. पण आम्ही सर्व मैत्रिणी तर महिन्यातून एकदाच भेटतो. मग काय महिन्यातून एकदाच बबड्या??? नॉट फेयर...काय करावे सुचत नव्हते. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला.
अचानक एक भन्नाट कल्पना सुचली. अर्थात ही फक्त आपल्यातच ठेवा हं. जगभर सांगू नका...नाही तर सगळे टिंगल करतील. तर ती कल्पना अशी आहे की आपणच आपल्याशी लाडाने बोललो तर?....
काय बरे म्हणावे???....शेवटी त्या अग्गोबाईचा प्रभाव वरचढ झाला आणि बबड्या म्हणायचे पक्के ठरले.
मग काय अंगात उत्साह संचारला आणि कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू केले. पण सुरूवातीस स्वतःला बबड्या बबड्या म्हणणे वेगळेच वाटायचे. मग काही दिवस आयुष्यातील सर्व मोठया व्यक्तींचे स्मरण करत त्यांच्यावतीने  स्वतःला बबड्या म्हणायला लागले. हळूहळू मीच मला लाडिक हाक द्यायला शिकले. काय मस्त अनुभव येतो ....पण परत सांगते ...नो बोभाटा...फक्त आपल्यातच ठेवायचे बरं हे सिक्रेट...प्रॉमिस ना?.. तर माझा गुपचुप गुपचुप बबड्याचा प्रयोग सुरू झाला. काय आश्चर्य शरीराच्या कुरबुरी कमी होऊ लागल्या. सकाळी उठावेसे वाटायचे नाही. चांगली सात तासांची झोपदेखील पुरेसी नसायची. खूप थकले आहे म्हणून लवकर उठायचेच नाही. मग एकदा सकाळचे सात वाजून गेले की व्यायाम, फिरणे बंद आणि स्वयंपाक घरात कामे सुरू. आपण चुकतो आहोत, हे वागणे एक दिवस फार महागात पडेल असे रोज स्वतःला रागवायची. पण मनावर कसलाही परिणाम होत नव्हता. पण प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी आसुसलेल्या मनाला बबड्या संबोधलेले खूप आवडले. सकाळी सकाळी शरीराला जाग आल्यावर जे झोप झोप म्हणणारे मन असते ना त्याची मनधरणी करायला सुरुवात केली. त्याला रोज म्हणावे लागते," बबड्या, ए बबड्या, उठ ना आता, आपले आरोग्य चांगले ठेवायचे आहे ना? की जायचे आहे परत आय.सी.यू.मध्ये? शहाणा आहेस ना तू? मग चल आवर बरं लवकर. बबड्या, तुला अजून एक गोष्ट सांगते, तू वॉक करताना ती जुनी गाणी, प्रवचन, कथा वगैरे ऐकतेस ना तर त्याऐवजी तू मस्त झिंगाट गाणी लावून चालून बघ. कसं असतं की गाण्याच्या गतीप्रमाणे आपण चालतो. त्यामुळे तुला फास्ट चालण्याची सवय होईपर्यंत तरी तू हा प्रयोग करून बघ. उठ बरं आता, आपल्याला तब्येत चांगली ठेवायची आहे ना? माहिती आहे सोन्या, तू सर्व कामे करून थकून जातेस. पण चालणेही आवश्यक आहे ना? तुझी तब्येत तुलाच सांभाळावी लागणार आहे ना?”
आईशपथ, रोज एवढं प्रेमाने आजवर कोणी बोलल्याचे आठवत नाही. मग काय मस्तपैकी कानांत ईयर फोन, पायात बूट घालून अस्मादिक वॉकिंगला तयार!!! आजवर,” ही काय गाणी आहेत का? काही अर्थ तरी आहे का ह्या गाण्यांना?” असे म्हणणारी मी आता मस्तपैकी झिंगाट गाण्यांवर ठेका धरत अशा काही स्पीडने चालते की झिंग येऊन पडायचीच बाकी राहते. एवढं दमून भागून घरी आल्यावर थोडी विश्रांती तर हवीच असते. पण सकाळची कामे डोळ्यांसमोर येतात आणि तशीच किचन मध्ये जाऊ लागते. पण तिथेही मनाला सांगावे लागते,” अरे, बबड्या, एक पाच मिनिटे तर बस ना. किती दमली आहेस तू. थोडे निवांत बसून पाणी तरी पी आणि मग लाग कामाला.”
काय छान वाटते म्हणून सांगू.....आपणच आपली काळजी घ्यायची......कशाला पाहिजे कोण......मग मस्तपैकी पाच मिनिटे बसून सावकाश पाणी प्यायले आणि अगदी फ्रेश मूडमध्ये कामाला लागले.
ही बबड्याची जादू खूप ठिकाणी उपयोगात येऊ लागली. शरीराचे बरेचसे नखरे ह्या मनरूपी बबड्याने कमी केले.
कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आला असेल तर थोडे बबड्या ...बबड्या ....करून कामे करून घेता येतात. अर्थात कंटाळा शब्दाला आयुष्यातून घालवणे काही सोपा टास्क नसतो. कारण ह्या कंटाळ्यावर शारीरिक कुरबुरी, थकवा अशी विविध भरभक्कम आवरणे असतात. सुखाने ऐसपैस पसरलेल्या देहाची ही आवरणे ओरडून किंवा ओरबाडून निघणे अवघड असते. म्हणून मग मी आपले बबड्याला हाताशी धरले.
आज कामवाली बाई नाही आली.....लगेच मूड जायला नको.....मग आज बबड्याला थोडे जास्त काम पडणार...पण.....बबड्या करून टाकणार. दुपारी खूप झोप येते ना? पण बाबू डॉक्टरांनी दुपारी झोपायला नाही संगितले ना?...मग तू असे कर खुर्चीतच वामकुक्षी घे. काय म्हणतेस लिहिण्याचा कंटाळा आला??? सोन्या, लिही ना पटकन....ऐकणार ना तू...लिहून व्यक्त होणे आवडते ना तुला मग का ग असा कंटाळा करतेस तू सोनू....लिही बरं आता लगेच...
इट्स वर्कड!!!! काय आश्चर्य, माझे सुस्तावलेले शरीर एकदम ताजेतवाने झाले आणि अगदी अर्ध्या तासात किचनला रामराम ठोकून मी अगदी शहाण्या बाळासारखी लिहायला बसले. बबड्या शब्दात एवढे वजन असेल असे अग्गंबाई चा बबड्या बघून तर अजिबात वाटले नव्हते. गंमत म्हणजे आपण आपल्याला बबड्या म्हटलेले कोणाला कळत देखील नाही. तेरी भी चूप...मेरी भी चूप.
विश्वास नाही बसत??? मग करूनच बघा.
खरेतर व्यक्ती नोकरी करणारी असो वा घरीच असो, पण रोज रोज त्याच त्याच साचेबद्ध जीवनाचा तिला कंटाळा येतो. मग अशावेळी सोन्या, राजा, बबड्या हे वरवर साधे वाटणारे शब्दही स्वयं-प्रेरणा ( self-motivation) देतात. देव जसा भावाचा भुकेला तसे मन प्रेमाचे भुकेले असते. म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी मनोबोधात मनाला सज्जन संबोधत उपदेश केला आहे. मना सज्जनाच्या ऐवजी आपण आता अधिक प्रेमाने मनाला बबड्या, सोन्या, राजा वगैरे म्हणून त्या चंचल मनाला स्थिर करू या.
कोणावर चिडलो, ओरडलो किंवा कमी लेखले तर तो आपली कामे मनापासून करेल का??? नाही ना.....तसेच आपले स्वत:चे देखील असते. आपले काम काढून घ्यायचे असेल तर जिभेवर साखर ठेवावी म्हणतात. मग ही साखरपेरणी स्वतःच्या बाबतीतपण नको का??? आपण जर आधी स्वतःशी गोड बोलू शकलो तर इतरांशी देखील बोलू शकू असे मला वाटते. हं, पण नेहमीच सतत गोड बोलून चालत नाही. कधी कधी रात्री व्हाट्सअप वर मन जास्तच रेंगाळू लागले तर थोडे दटावणीच्या सुरात सांगावे लागते,” नो बबड्या नो.....किती वाजले बघ बरं आता.....झोप बघू लवकर ......उद्या वॉकिंगला उठायचे आहे ना ....झोपा मग आता, आणि हो, ठरवल्याप्रमाणे दिवसभरात काय काय चांगले-वाईट घडले आणि काय काय चांगली कामे केली, काय चुका झाल्या....सर्व लिहिल्याशिवाय झोपायचे नाही हं.
नाही म्हटले तरी माझ्यात झालेला बदल घरात झेपणारा नव्हता. असे काय घडले की ही एवढी मोटीवेटेड झाली हे कोणालाच कळत नव्हते. सकाळी सकाळी लिहिताना पाहून जो तो टोकट होता,” आज काय विशेष सकाळीच लिहायला बसलीस.” आता त्यांना कसे सांगणार ना की माझ्या बबड्याने बसवले आहे. फुल्ली सीक्रेट आहे बाबा हे ....कळायला नको हं .....नाही तर सर्व माला बबड्या बबड्या करून चिडवतील.
शेवटी एवढच सांगेन,
                  मन शहाणं शहाणं
                  गोड शब्दांचं भुकेलं
                  नका करू गार्हाण
                  गोंजारा त्याला प्रेमानं
तर असेच कोणीतरी सोन्या, बबड्या तुमच्याही आयुष्यात येवोत हीच शुभेच्छा!!!!
@ मंजुषा देशपांडे, पुणे.








Saturday, 5 October 2019

रंगाष्टक


" हे काय, ही कुठली साडी??? मी तुम्हाला करडा  म्हणजे ग्रे रंग सांगितला होता ना!!" सौ. कडाडली.
"अगं, मूळ साडीचा रंग करडाच आहे ना, त्यावर बाकी सारे रंग आहेत. म्हणजे कसं एका साडीत सर्व नऊ रंग मिळून गेलेत." नवरोजींचा निरागस खुलासा.
" अहो, पण मी तुम्हाला अगदी व्यवस्थित करडा रंग दाखवून तोच आणायला सांगूनही तुम्ही जे करायचे तेच केले. बरोबर आहे, म्हणजे परत काही सांगायलाच नको. मला त्यातले काही कळत नाही म्हणत हात वर करायला मोकळे." सौ. ची बडबड चालू झाली.
" हे बघ साडीचा रंग करडाच आहे. त्यात थोडे इतर रंग असले तरी काय फरक पडतो?" आपली चूक मान्य करून शरणागती पत्करण्याऐवजी नवरोजी आपल्या मतावर ठाम होते. अर्थात चूक नुसती मान्य करून विषय संपला नसता. तर ती साडी परत करायला जावे लागले असते. त्यामुळे नवरा आपल्या परीने खिंड लढवत होता.
" थोडे इतर रंग म्हणतात याला? अहो पूर्ण रंगीबेरंगी साडी आहे ही. ऐन नवरात्रात तुम्ही माझी फजिती केली. जिथे तिथे आपणच जा. आज मला वेळ नव्हता म्हणून कधी नाही ते काम सांगितले.आता उद्या काय करू?" सौ.ची चिडचिड चालू होती.
" काय फरक पडतो प्लेन करडा रंग नसला तर?" नवरोजींचा भोचकप्रश्न.
" वाटलेच मला हा प्रश्न येणार!!! तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हणा!!! म्हणूनच ही रंगीबेरंगी साडी आणून सगळा बेरंग केला. तरी बरं कधी म्हणून काहीही आणायला सांगत नसते......
( "हो ना, स्वतःच जाऊन पैसे उडवून येत असते." नवर्‍याचा आतला आवाज.)......
"बाकी बायका बघा.....
("कसे बघणार? तुझी करडी नजर असते न माझ्यावर!!! तू काय सुखासुखी बघू देणार आहेस?" नवर्‍याचा आतला आवाज)
......नवर्‍याला घेऊन गावभर फिरवून पाहिजे त्या रंगाची, पाहिजे त्या प्रकारची आणि पाहिजे त्या किंमतीची साडी घेऊन येतात. आजवर मी कधी काही हट्टाने मागितले आहे का?..तुम्हाला माझी काही किंमतच नाही. मी होते म्हणून......सौ. च्या रागाच्या भावनेचा रंग बदलू लागला'
("झालं...आता आजवर आपल्यामुळे कसा संसार झालं ह्याची यादी येणार आता...!!! पटकन विषय बदलला पाहिजे." नवर्‍याचा आतला आवाज).
" अगं, माझे ऐक ना थोडे, मी खूप डोकं वापरुन ही साडी घेतली आहे ग. ही नौरंगी साडी आहे. नवरात्रीचे नऊ रंग आहेत बघ यात." त्या करड्या साडीपायी नवरोजींचा घसा कोरडा पडायची वेळ आली होती.
" मग काय एकच साडी रोज वापरू???" सौ. अधिकच वैतागली.
" मी काय तुला एवढा बुद्धू वाटलो काय? ही बघ अगदी तशीच दुसरी साडी!!! एक धुतली की दुसरी नेसायची." मोठ्या फुशारकिने नवरोबा म्हणाले.
"अहो, किती वर्षे झालीत आपल्या लग्नाला? अजूनही बायकोला काय आवडते काहीच कळू नये?? हात टेकलेत तुमच्यापुढे. साधी करड्या रंगाची साडी सांगितली होती. कोणी  होते नाही तिथे डोके वापरायला??"
" ए, अशी चिडू नकोस ना...चिडल्यावर तर तू अजूनच छान दिसतेस...मग मी परत प्रेमात.....
"ओहोहो , पुरे झाले हं आता. तोंड पाठ झालेत तुमचे सर्व फंडे. काहीही सारवासारव नकोय. आयुष्य घालवले आहे तुमच्यासोबत. काय काय नाटकं सहन केली आहेत माझे मला माहीत.....
( बाप रे!! परत काय काय सहन केले याची यादी.....नको रे बाबा....इति त्याचा आतला आवाज).
"अगं, पण पूर्वी कुठे होते हे सर्व??? आहे त्याच साडीतच नवरात्राची पुजा आणि मजा दोन्ही साधले जायचेच ना???"
" होत होते ना सणवार साजरे.... पण बदलत्या काळाप्रमाणे आपणही थोडे बदललो तर कुठे बिघडले? आता देवीलाही बघा ....देवीला देखील वाराच्या रंगाप्रमाणे साडी नेसवली जाते. पण लक्षं असते कुठे?"
" मंदिरात देवीचे दर्शन घ्यायचे असते की साडी पहायची असते?" नवरोजी पण आज माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
" कळतात हो मला टोमणे....पण मी म्हणते दर्शन घेताना साडी पण बघितली तर देवीचा कोप होतो का?? जाऊ द्या तुमच्याशी बोलण्यात अर्थच नाही. माझे मीच बघते काय करायचे ते. तुम्ही फक्त ह्या तुमच्या नौरंगी साड्या तेव्हढ्या परत करा." बायकोने फर्मान काढले.
झाले....जे नको होते तेच घडले. आता ह्या साड्या परत करायच्या म्हणजे परत त्या गर्दीत जा...दुकानात थांबा....काय करावे बरे ......अचानक नवरोजींच्या सुपीक डोक्यात एक युक्ति आली. एक प्रयत्न करून बघू या म्हणत ते सौ. ला म्हणाले." तुला अगदी खरं सांगू का मी ही साडी तुझ्यासाठी खूप विचारपूर्वक घेतली आहे ग. ह्या साडीत ना मला तूच दिसलीस."
" पूरे...पूरे ...मखलाशी. जा आधी साड्या परत करा." सौ. काही ऐकत नव्हती.
" अगं माझे बोलणे पूर्ण ऐकून तर घे. मग मी जाईन ना परत करायला. तर ह्या साडीचा मूळ रंग आहे, ग्रे...करडा ..किंवा राखाडी. हा रंग म्हणजे समतोलत्वाचे प्रतीक आहे. हा रंग मला तुझ्या स्वभावाशी खूप मिळताजुळता वाटला. कारण आजवर आयुष्यात जे काही पांढरे आणि काळे दिवस ....सुख आणि दू:खं ....आनंद आणि संकटे ..आलीत, त्या सर्वांमध्ये तू कुठेही न डगमगता आहे ते सर्व स्वीकारत मार्गक्रमण करत असतेस. पण हा समतोल साधताना केशरी रंगाची उत्साही वृत्ती/शूरता/सकारात्मकता, लाल रंगाची स्फूर्ति/आकर्षकता, निळ्या रंगाची शांत संयमी वृत्ती, पांढर्‍या रंगाची निरागसता/ सर्वसमावेशकता, हिरव्या रंगाची समृद्धी/ प्रगती, पिवळ्या रंगाची प्रखरता/ तेजस्विता आणि गुलाबी रंगाची खेळकर वृत्ती/ रोमांटिकपणा अशा सर्व रंगांची उधळण करत आणि माझ्या सर्व रंगांना स्वीकारत तू स्वतः ही भरभरून जगलीस आणि आम्हालाही भरभरून आनंद दिलास. मग का नाही मी तुला अशी रंगीबेरंगी साडी घेणार??? इति नवरोजी.
"इश्य!!! तुमचे आपले काहीतरीच हं !!! असे मी नवी नवरी असते तर तुमच्या बोलण्याला भुलून म्हणाले असते'. आता मात्र तुमचे सर्व रंग चांगलेच ओळखून आहे हो! काही बोलू नका. तरीही आज मात्र तुम्ही जिंकलात बरं का. आवडले मला तुमचे वेळेवर सुचलेले तत्वज्ञान. आज तर मी माझ्या करड्या रंगाचीच साडी आणणार आहे. ह्या नौरंगांचा संगम आपण दसर्‍याला करू, द्या ते साडीचे बिल माझ्याकडे, निदान एकतरी साडी परत करून माझी करडी साडी आणते." सौ. पारा आता खाली आला होता.
 "तुझा  हाच समजूतदारपणा मला खूप भावतो. हे मात्र मी अगदी मनापासून बोलतोय हं!!! प्रत्येक रंगाचे योग्य मिश्रण ज्यांना जमते  ना, त्यांचे आयुष्य सुखी होते. त्यामुळे रंगांचे गुणधर्म समजले ना की व्यक्तींचे रंग ओळखून त्या प्रमाणे आपला रंग दाखवावा. रंगांप्रमाणे माणसे बघत गेलो ना तर त्या व्यक्तीच्या वागण्याचा अर्थ समजतो आणि मग तिचे वागणे खटकत नाही. उलट तिला समजून घेता येतं आणि कोणत्या रंगांच्या छटा कमी करायच्या, कोणत्या वाढवायच्या यासाठी मदत करता येईल. तुम्हा बायकांचे हे निरीक्षण खरंच खूप चांगले असते. फक्त त्याला रंगांच्या अभ्यासाची जोड हवी. त्यामुळे नवरात्रीत ह्या सर्व रंगांची उधळण तनाप्रमाणे मनावर सुद्धा झाली तर  तनाच्या सौंदर्याबरोबर मनाचे सौंदर्यही खुलून येईल आणि सुंदर इंद्रधनुष्यी रंगांचे आयुष्य साकार होईल." नवरोजी जीवनाच्या रंगात गुंगले होते.
" कुठे वाचता तुम्ही हे सर्व? कमाल आहे बाई!!! आता हे रंगांचे तत्वज्ञान सर्वांना सांगायलाच हवे." सौ.चा नवर्‍यावरील गहिर्‍या प्रेमाचा रंग बोलू लागला.
शेवटी नेहमीप्रमाणे मनावर करड्या रंगाची शेड पांघरून गुण दोषांसाहित नवरोजींना स्वीकारत आनंदाने सौ ने ती करडी साडी घरात आणली आणि नवरोजींना गृहलक्ष्मी प्रसन्न झाली.
दसर्‍याच्या दिवशी बाहेर काही चौकस मैत्रीणी सौ. ला विचारत होत्या," अय्या, आज दसर्‍याला अशी काय साडी नेसलीस तू ?"
सौ. मोठ्या खुशीत  सेल्फी काढत त्यांना सांगत होती....आज दसरा....म्हणून सर्व नौरंग असलेली साडी....रंगांचे गुणधर्म.....आयुष्यात असलेले त्यांचे महत्व.....
" साडी भाऊजींनी आणलीय वाटतं.....त्यामागे एवढे तत्वज्ञान चालले आहे म्हणून विचारले." त्यातली एक पचकलीच.
पण सौं. स्वत:च्या रंगात एव्हढी रंगून गेली होती की कोण काय बोलतेय हयाकडे तिचे लक्षच नव्हते.
आयुष्यात पहिल्यांदाच नवरोजींना आपल्या बुध्दिमतेचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
अशी ही रंगांची कहाणी नवरात्रीत नाही तर संपूर्ण आयुष्यभर मनावर कोरली गेली तर जीवनातल्या सर्व रंगांचा स्थितप्रज्ञतेने अनुभव घेता येईल.

@ सौ. मंजूषा देशपांडे,पुणे.
( पोस्ट बिनधास्त शेअर करा....फक्त नावासहित)॰



Sunday, 29 September 2019

मैत्रीची परिभाषा



“काय झाले आई? तुझा मूड का ऑफ आहे आज? काय घडलेय?”
“काही नाही ग असंच!”
“कुछ तो हुआ है मॉम... नही तो तुम ऐसी गुमसुम नही बैठती
लेकीच्या ह्या वाक्याने नेहाच्या डोळ्यांत टचकन पाणी आले. स्वतःला कसेबसे सावरत ती लेकीला म्हणाली, “तुम्हा मुलांचा एवढा मोठा मित्र परिवार असतो, सर्वांशी तुम्ही अगदी जीवश्च-कंठश्च असल्यासारखे वागतात. खरंच तुम्ही एवढे क्लोज्ड असतात?”
“ हो...अर्थात! सगळे क्लोज्ड असतात; पण त्या त्या विषयापूरते. बाकी सर्व विषयांच्या संबंधित किंवा सर्वस्व म्हणता येईल असे फार थोडे असतात.
“म्हणजे? मला नाही कळाले. अशी विषयाप्रमाणे मैत्री असते? ती ही जिवाभावाची?” नेहाने आश्चर्याने विचारले.
“ अरे जमाना बदल गया है भाई. तो दोस्ती की परिभाषा भी बदलनी चाहिये ना मॉम.”
“ जरा मला समजेल अशा भाषेत बोलाल का मॅडम!!!! आधीच माझा मूड ठीक नाहीये.”
“ मी तर आधीच तुला विचारले ना की काय झालेय तुला?”
अगं, सगळं कसं अचानक बदलल्यासारखे वाटते. कोण आपला आणि कोण परका काहीच कळत नसल्यासारखे वाटते. कोणासोबत राहावे, कोणावर विश्वास ठेवावा काहीच कळत नाही ग. माणसं अशी बदलू शकतात ह्याचा विचार करून खूप त्रास होतो.” नेहा अजूनही खूप अस्वस्थ होती.
“कम ऑन मॉम, किती विचार करतेस ग प्रत्येक गोष्टीचा? खरं सांगू का आई, व्यक्ती बदलत नसते. पण आपण त्या व्यक्तीला ओळखण्यात चुकलेलो असतो आणि आपली ती चूक आपल्याला मान्य नसते. म्हणून मग खापर दुसर्‍यावर फोडले जाते. तुझे वागणे म्हणजे मैत्री करायची तर शंभर टक्के नाहीतर लगेच तू अंतर्मुख होतेस आणि सगळ्यांपासून तुटल्यासारखी बाजूला होतेस. दॅट्स नॉट फेअर मॉम. यू हॅव टु अॅडजस्ट विथ ऑल टाइप्स ऑफ पीपल.”
“ कळते ग मलाही ते, पण कसे? अॅडजस्ट होणे आणि अप्रामाणिक असणे हयातला फरकच मला कळत नाहीये.” नेहा खूपच वैतागली होती.
“आईड्या, तुझा गोंधळ कुठे होतो सांगू का? तू ना मैत्रीचे ते जूनेच समीकरणे डोक्यात घेऊन बसली आहेस. अमुक एक व्यक्ती आपली मैत्रीण म्हणजे तिच्याशी सर्व काही शेअर करायचे. बरं, शेअर करणेही ठीक आहे, पण तुला लगेच वाटायला लागते की तिने पण तुझ्याशी तसेच राहावे.”
“बरोबरच आहे ना मग??? मी तर आजवर अशीच मैत्री केली आहे प्रत्येकाशी.” नेहा ठामपणे बोलली.
यही तो लोच्या है न भाई, जमाना किधर जा रहा है और तू वही अटक के पडी है. सून भाई,
“एक मिनिट, तू तुझे ते भाई बी आधी थांबव आणि नीट बोल माझ्याशी”. नेहा चिडून बोलली.
“अगं माते मी काय सांगते ते नीट ऐक आधी. आता काळाप्रमाणे तू स्वतःच्या राहणीमनात बदल केलेस ना??? तशी आता मैत्रीची परिभाषाही बदलून बघ. तू काय कर, माझ्यासारखे मैत्रीचे वेगवेगळे कप्पे मनात तयार कर. कोणतीही मैत्रीण किंवा मित्र भेटला की पहिल्यांदा कप्पा आठवायचा. मग पटकन तो कप्पा उघडून मनोसक्त मजा करायची. बाकी त्या व्यक्तीच्या आयुष्यात ती काय करते, कोणाबरोबर राहते त्याच्याशी आपला काहीही संबंध नसतो. मग बघ तुलाही प्रत्येक मैत्रीचा आनंद लुटता येईल.”
“ असे केल्याने तर आपली जीवाभावाची अशी मैत्री कशी होणार ग?” नेहाला हे सर्व वेगळेच वाटत होते.
“अरे यार ऐक तर पूर्ण. जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी मैत्री येते तेव्हा लगेच तिला जवळची सखी असे मानण्याची घाई नाही करायची. तिला पटकन एखाद्या कप्प्यात टाकायचे. जसे शाळेची मैत्री, कॉलेजची मैत्री, व्यावसायिक मैत्री, सामाजिक मैत्री असे किंवा इतर अनेक विषय घेऊन कप्पे करायचे आणि त्यात त्या व्यक्तीला टाकायचे. हळूहळू काही मैत्री त्या कप्प्यापूर्तीच राहते किंवा कधीकधी खरोखर जवळची, आपली अशी वाटू लागते. मग त्या व्यक्तीला आपण जीवलग मैत्रीच्या कप्प्यात टाकायचे.”
“बाप रे... मैत्रीतही असे असते?” नेहाचा विश्वासच बसत नव्हता.
“असे काही नियम नाहीयेत ग आई....पण आपल्याला त्रास होऊ नाही म्हणून मी आपले असे करते. म्हणजे कसे होते की एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात उगाचच आपली लुडबूड नको आणि ती कोणाबरोबर कुठेही गेली तरी जोपर्यन्त आपल्या विषयाशी तिचे आपल्याशी चांगले संबंध आहेत तोपर्यंत आपणही काही वाईट वाटून घ्यायचे नाही.
पण ह्या कप्प्यांच्या नादात आपली जीवाभावाची अशी मैत्रीच झाली नाही तर?” नेहाला लेकीचे म्हणणं एकीकडे पटत होते. पण हे वास्तव स्वीकारणे जड जात होते.
“तसे तर कधी होत नाही ग आइडू. पण कधी कधी कप्पा चुकू शकतो. जेव्हा आपल्याला असे वाटते ना की समोरची व्यक्ती बदलली आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपला कप्पा चुकला आहे. मग कप्पा बदलला की आपल्या त्या व्यक्तिविषयीच्या वागण्याच्या अपेक्षाही बदलतात. पण ह्या कप्प्यांना थोडा वेळ दिला ना की त्यातूनही जिवाभावाचे सख्य होऊ शकते ग. समजा नाहीच झाले तर एकला चलो रे म्हणत जीवन आनंदात घालवायचे. आपल्या आयुष्यात आपला आनंद कायम स्वतः कडे असतो असे तूच म्हणतेस ना. तसे पाहिले तर आपण जन्माला एकटे येतो आणि जाणार पण एकटेच असतो. त्यामुळे मैत्री अमर असते, जीवास जीव देणारी असते ह्या सर्व बोलायच्या गोष्टी असतात. कोणाचेच आयुष्य कोणावाचून थांबत नसते. हेच सर्व प्रकारच्या संबंधांना लागू आहे. त्यात कौटुंबिक, सामाजिक, व्यावहारिक आणि व्यावसायिक संबंधातही असे कप्पे करून जगल्यास आयुष्य सुखकर होते. त्यामुळे काहीही चढउतार आले तरी शो मस्ट गो ऑन म्हणत जगण्याचा आनंद घेत जायचा. जीवनाच्या रंगमंचावर कायम हाऊसफूल शो करण्यासाठी यू मस्ट हॅव टू अॅडजस्ट विथ एव्हरी सिचुएशन. नाहीतर तुम्ही दुनियेच्या अशा कोपर्‍यात फेकले जाल की स्वतःच स्वतःला सापडणार नाही.”
“कुठे शिकलीस ग ही सर्व??? थॅंक्स डियर!!! असे म्हणत नेहाने लेकीला गच्च मिठी मारली, खुशीतच स्वतःभोवती एक गिरकी घेतली. “आधी शोधा कप्पा मग करा मैत्रीच्या गप्पा” असा मंत्र जपत ती मैत्रीच्या नवीन परिभाषेत स्वतःस फिट करायला सज्ज झाली.


 @ सौ. मंजूषा देशपांडे, पुणे