लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Friday, 9 November 2018

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर

काल 'आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट फर्स्ट दे फर्स्ट शो पाहून आले.
खरंतर मी काशिनाथ घाणेकर यांचे काम कधी पाहिले नाही. फक्त त्यांच्या नाटकांची आणि चित्रपटांची नावे ऐकून होते. त्यामुळे त्यांना जाणून घेण्याची उत्सुकता तर होतीच पण त्याहूनही जास्त उत्सुकता सुबोध भावेला त्यांची भूमिका साकारताना बघण्याची होती.
चित्रपटात सुबोध भावे चे काम एकदम कडक असे आहे. काशिनाथ घाणेकरांचे जीवन चरित्र दाखवताना त्या काळातील त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या इतर मातब्बर कलाकारांच्या  व्यक्तिरेखाही वेशभूषा, अभिनय आणि चित्रीकरण अशा सर्वच बाबतीत अतिशय उत्कृष्ट चित्रित झाल्या आहेत.
चित्रपटात करमणुकीसाठी कुठलाही अतिरिक्त मसाला न घालता काशिनाथ घाणेकरांना जसे रंगभूमीचे सुपरस्टार दाखवले गेले आहे, तसेच प्रसिद्धीची हवा डोक्यात  गेल्याने आलेला उर्मटपणा, बेफिकिरी आणि दारूचे व्यसन या गोष्टीमुळे त्यांच्या आयुष्याची झालेली वाताहत अगदी स्पष्टपणे मांडली आहे. चित्रपटात कुठेही काशिनाथ घाणेकर यांच्या चुकांवर पांघरूण घातले नाही. प्रेक्षक एका चांगल्या कलाकाराला त्याच्या चुकांमुळे, वाईट व्यसनांमुळे नाकारू शकतात हा बोध या झगमगत्या दुनियेतचे आकर्षण असणाऱ्यांना नक्कीच घेण्यासारखा आहे.
एकूण काय तर सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी,नंदिता धुरी, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी या सर्वांचे अभिनय उत्तम. शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा चित्रपट. दिग्दर्शन, वेशभूषा, कथेची मांडणी, नाट्यप्रसंग सर्वच बाबतीत कडक असा चित्रपट. मी स्वतः पाचपैकी 4.5 स्टार्स नक्कीच देईन.
आज ९ नोव्हेंबर २०१८ रोजी सुबोध भावेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढेच सांगेन की तुझ्या बालगंधर्व, लोकमान्य टिळक, तुला पाहते रे आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर ह्या सर्व भूमिका बघितल्यास तुझेही नाव शेवटी लिहून 'आणि सुबोध भावे' असा योग येणे दूर नाही.

©मंजुषा देशपांडे, पुणे.

Sunday, 4 November 2018

माझी झापडी

दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव. दिवाळीचा पाडवा म्हणजे नवऱ्याकडून हमखास भेट मिळवण्याचा दिवस. नवऱ्याने नेहमीप्रमाणे विचारले, "काय द्यायचे का यंदा तुला " हे विचारतानाही त्यांना माहिती  होतं की नेहमीप्रमाणे उत्तर येणार की माझ्याकडे सगळं आहे, मला खरच काही नको.
हयावेळी मात्र माझ्या डोक्यात वेगळीच भेटवस्तू घुसली होती. त्यामुळे मी विचारले ,"मागू का? खरंच द्याल ना?"
माझ्या डोळ्यातली वेगळीच चमक बघून नवऱ्याच्या चेहऱ्याची रयाच गेली. झालं, कधी नाही ते मागत आहे म्हणजे  एवढ्या वर्षांची भरपाई होणार दिसते. नवरा स्वतःशीच पुटपुटला.
"काय घ्यायचे तुला?" पहिल्यांदा विचारण्यातला उत्साह थोडा कमी झाला होता." तशी तू समंजस आहेस. आज पर्यंत एकमेकांना समजून घेऊनच आपण यशस्वी संसार केला." नवऱ्याची खिसा वाचवण्याची केविलवाणी धडपड सुरू झाली.
पण मी आपलं सोईस्कर दुर्लक्ष करत म्हटले, "खरं आहे. पण ह्या वेळेस मला माझ्या मनातली भेटवस्तू हवी आहे. कशी आणि कुठे मिळेल हे मलाही समजत नाहीये. पण ती जर मिळाली तर माझ्या आयुष्याचे सार्थक होईल. "
ह्यावेळेस आपण पुरते लुबाडले गेलो आहोत याची जाणीव होऊन जड अंतकरणाने पतीदेव म्हणाले,"बोल ना काय हवे आहे आपण नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न करू."
मग मी सरळ सांगितले की मला झापडी हवी आहेत.
नवरा बसल्या जागीच उडाला. काय? झापडी?  म्हणजे काय?जनावरांना घालतात ती? तुला कशाला हवीत ?
अहो, त्या दिवशी नाही का दूरदर्शन वरच्या कार्यक्रमात अशोक सराफ म्हणाले,"आयुष्यात इतरत्र कुठेही डोकावले नाही. घोड्याला लावतात ना तशी झापडी लावून फक्त अभिनय एके अभिनय केला." अभिनयाच्या दिशेने लावलेल्या झापडींनीच त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवले.
त्यावरून माझ्याही लक्षात आले की आपण आजवर कोणत्याही क्षेत्रात  यशस्वी का नाही झालो, तर आपण दिशाहीन भरकटत आहोत. अजूनही आयुष्याची दिशा नीट समजत नाहीये. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. खरंतर लहानपणी झापडी घातलीत का डोळ्यांना? हे वाक्य नकारात्मक अर्थानेच वापरले जायचे. त्यामुळे झापड्यांचा सकारात्मक अर्थ कधी कळलाच नाही. नाहीतर प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींच्या रांगेत आपण ही असतो असे उगाचच मनाला वाटून गेले.
म्हणूनच मला यंदा दिवाळीत लक्षवेधक अशी झापडी हवी आहेत. ही झापडी घालून अंदाधुंदपणे सैरभैर धावणाऱ्या मनाला, विचारांना दिशा देणार आहे. द्याल ना मला, मला हवी तशी झापडी घेऊन? मी आपला लाडीक हेका चालूच ठेवला.
नवर्याचा खिसा सुरक्षित राहिल्याने त्याने सुटकेचा श्वास सोडला. पण झापडीच्या खुळाचे काय करावे हे काही समजत नव्हते .शेवटी नाईलाजाने पतिराजांनी ऑनलाइन झापडी शोधायला सुरुवात केल्याचे मी केल्याचे पाहिले. झापडी शोधता-शोधता डोळ्यांवर झापड येऊन ते गाढ झोपी गेले. आता माझ्या पुढील आयुष्याची दिशा पाडव्याला ठरणार आहे. बघूया काय होते ते.
चला, त्यामुळे ह्या वेळेसचा पाडवा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एकदा का ही कोरी करकरीत झापडी लावून त्या दिशेने बेछूट धावत सुटले की जीवनाच्या वाटेतील संसार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मूड, अनुत्साह आणि आळस हे सर्व अडथळे आपोआपच दूर होऊन जीवन खऱ्या अर्थाने सुखी समाधानी,आनंदी आणि यशस्वी होईल अशी आशा मला आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐन दिवाळीत मी हे काय घातलयं असा प्रश्न तुम्हाला पडायला नको म्हणूनच हा लेख प्रपंच.

Saturday, 15 September 2018

गौरींचे आगमन

आई आपण गौरी बसवायच्या का? अमृताने म्हणजे
सुनेने विचारले. तिच्या या प्रश्नाला काय आणि कसे उत्तर द्यावे हे समजत नव्हते. अग गौरींचे करणे काही सोप्प नाहीये. त्यांच्यासाठी सोवळ्यात स्वयंपाक, पुरण वरण,दिवे सोळा भाज्या  असं खूप काही करावं लागतं. "म्हणजे देव सुद्धा सर्व काही खात नाही? त्यांची सुद्धा फर्माईश असते? "माझा नास्तिक मुलगा मध्येच पचकला. त्याला गप्प करून मी माझा विषय पुढे नेत म्हणाले, शिवाय एकदा जर घरी बसल्या तर दरवर्षी बसवावे लागतात अर्धवट सोडता येत नाही.
मग काय झाले करू न आपण.दरवर्षी... सून काही माघार घ्यायला तयार नव्हती.  तुझ्या सासर्‍यांशी बोलू नवऱ्याची बोलू आणि मग ठरवू असे म्हणून ती वेळ मारून नेली.
नवऱ्याला तर तिने पटवून ठेवले होते आणि दुसरे करत असतील तर सासऱ्यांना सुरु करायला काहीच हरकत नव्हती. तरीही शेवटी तिला म्हंटले की आपण आपल्या नवीन घर झाल्या वर तिकडे सुरू करू. तिने कसेबसे हो म्हंटलं आणि एवढंसं तोंड करून बसली. पण मीही तिच्या त्या उतरलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्षच केले. कारण मला हेच माहिती होते की गौरींचे सर्व साग्रसंगीत करावे लागते. आणि आता ह्या गोष्टीत वेळ घालवावासा वाटत नव्हता.पण ती काही पिच्छा सोडायला तयार नव्हती. मग मला तिने सेव्ह करून ठेवलेले गौरींचे फोटो दाखवले. आणि म्हणते कशी हे बघा हे काढून ठेवले होते फोटो असच मला डेकोरेशन करायचं होतं. करायचे का? ती तिचा लाडिक हट्ट सोडत नव्हती.

या पोरीला कसे समजवावे हेच कळत नव्हते. शेवटी गौरींना शरण जायचे ठरवले. त्यांना विनंती केली एकंदर परिस्थिती बघता तुमचे आगमन आमच्या घरी होणार दिसते. पण मी देखील माझ्या शरीराची,मनाची प्रसन्नता उत्साह,आनंद टिकवून ठेवून जेवढे काय करता येईल तेवढेच करेन. स्वयंपाक सुद्धा जो शक्य होईल तो. मुख्य म्हणजे एखाद्या वर्षी नाही जमलं तर भयंकर काही घडेल यावर माझा विश्वास नाही. कारण तुम्ही देवस्वरूप आहात आणि आमची अडचण समजून घ्याल ह्यावर माझा पूर्ण  विश्वास आहे. देव कोणत्याही परिस्थितीत आपल्या भक्तांना शिक्षा करत  नाही अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे हे गौरीनो, तुम्ही मुलाबाळांसह या वर्षी माझ्या घरी यावे आणि माझी साधी अशी सेवा स्विकार करावीअशी प्रार्थना गौरींना केली.
गौरीने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि अतिशय प्रसन्न चित्ताने मुलाबाळांसह त्यांचे आमच्या घरी आगमन झाले. सुनेचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहू लागला. घरातले वातावरण ही खूप आनंदी आणि प्रसन्न झाले. म्हणजे गौरींचे तर काहीच म्हणणे नव्हते. त्यांना फक्त प्रेमाने आणि भक्तिभावाने बोलावणे आवश्यक होते. बाकी जे काही द्याल ते स्वीकारायला त्या तयार होत्या. मला लक्षात आले की आपण उगीचच घाबरत होतो. लहानपणापासून मनावर हेच ठसले होते गौरींचं खूप करावं लागतं एकदा सुरू केल्या की बंद करता येत नाही नाहीतर त्यांचा कोप होतो वगैरे वगैरे वगैरे.... मनात अशी भीती असताना भक्ती भाव जागृत होणार कसा? पण भीती गेली आणि अतिशय प्रेमाने आणि भक्तीने गौरींचे स्वागत केले गेले. आणि असा भोळा भक्तीभाव ठेवल्यानेच घरात गौरी-गणपती असूनही मी मनातले विचार कागदावर उमटवू शकले आहे.
असेच प्रेम आणि हा भक्ती भाव कायम जागृत राहण्यासाठी सर्वांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक आरोग्य नीट राहो हीच गौरींच्या चरणी प्रार्थना.
-©मंजुषा देशपांडे, पुणे.