लेख मंजुषा

Happy Anniversary “हॅप्पी ऍनिव्हर्सरी डियर !!!” नवऱ्याने सकाळी सकाळी बायकोला शुभेच्छा दिल्या आणि विचारले, ” काय गिफ्ट हवे तुला?” ती लगेच म्ह...

Saturday, 15 February 2020

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द  बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत  मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच  दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
 त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.

Saturday, 18 January 2020

कोषांकित ते वलयांकित



आज सर्वांना मी एक गोड बातमी सांगणार आहे. इश्श्य !!! तशी गोड बातमी नाही काही!!!
तर नुकतेच मला भारती विद्यापीठाच्या विवाहपूर्व आणि वैवाहिक समुपदेशनाच्या ( Pre marital-marital counselling ) कोर्स मध्ये रौप्य पदक मिळाले. माझी अवस्था तर ‘आनंद पोटात माझ्या माहिना’ अशी झाली. त्यामुळे त्यावर लेख लिहूनच माझ्या सर्व सोशल मिडीयाच्या मित्र मैत्रिणींना ही आनंदाची बातमी शेअर करायचे ठरवले. वास्ततविक ही काही खूप जगावेगळी गोष्ट आहे असे अजिबात नाही. तरीही मला खूप खूप आनंद का झाला त्यामागच्या कारणांविषयी मी थोडा विचार केला आणि उत्तर मिळाले. हे उत्तर असे आहे की ते माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना लागू होऊ शकते म्हणून शेअर करायचे आवश्यक वाटले.
खरंतर मी लहानपणापासून अभ्यासात चांगली म्हणण्या इतपत नक्कीच होते. पण स्पर्धांमध्ये भाग घेणे, स्टेजवर जाऊन बोलून येणे या बाबतीत मात्र मी फार मागे मागे असायचे. फारसे कोणाशी बोलणे नाही, उत्तर येत असूनही पटकन हात वर करणे नाही आणि कधी कशात भाग घेणे नाही. माझ्या शाळेतील आणि महाविद्यालयातील मित्र-मैत्रीणीना हे नक्की आठवत असेल. जेव्हा इतर मुलंमुली विविध स्पर्धा गाजवून बक्षिसे आणायचे तेव्हा त्यांचा खूप हेवा वाटायचा. आपणही भाग घ्यावा असे खूप वाटायचे पण कधी हिंमतच झाली नाही. त्यामुळे कधी मेडल वैगरे मिळण्याचा प्रश्नच नाही आला.
चाळीशीच्या उंबरठ्यावर मात्र आपण काही करू शकलो नाही याची खंत मनाला वाटू लागली. माझ्या असे लक्षात आले की लहानपणापासून मी नकळतपणे स्वतःभोवती एक न्युनगंडाचा कोश ( Inferiority complex)  विणत गेले आहे. आपल्याला जमणार नाही, आपल्यावर सर्व हसतील, आपली इमेज खराब होईल अशा अनेक नकारात्मक धाग्यांनी स्वतःला वेढून घेतले होते. जसजसे मोठी होत गेले तसे हे कोशाचे आवरण अधिकच घट्ट होत गेले. बरं हे माझ्याभोवतीचे कोष कोणाला दिसतही नव्हते. कारण मला सर्व माझ्या कोशांसहितच ओळखत होते. कोणाला कसे कळणार होते की मी काय काय करू शकते.
जेव्हा हा  न्युनगंडाचा कोश मनाला आणि शरीराला खूप टोचू लागला तेव्हा मी ठरवले की हा आपण विणलेला कोष आपणच काढला तरच निघेल. त्या साठी कोणाची वाट बघत बसलो तर तो कधी निघणारच नाही. मग मात्र कोशाचा एकेक धागा काढायला सुरवात केली आणि मनातल्या सर्व सुप्त इच्छा पूर्ण करायला सुरवात केली. आधी बी. कॉम केलेले होते. पण मानसशास्त्र शिकायची खूप इच्छा होती. मग प्रथम बी.ए. मानसशास्त्र विशेष श्रेणीत पूर्ण करून एम. ए. साठी मॉडन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. तिथे मात्र प्रथमच ppt प्रेझेंटेशन, केस प्रेझेंटेशन अशा गोष्टींचा अनुभव घेत एम. ए. मानसशास्त्र (Counselling psychology) प्रथम श्रेणीत पूर्ण केले. मग मात्र स्वतः विषयीचा आत्मविश्वास वाढू लागला.
ह्यासोबत कथा, कविता, लेख , निबंध लिहिणे चालू केले होते. त्यामध्ये मिळालेल्या बक्षिसांनी हुरूप आला. त्यातूनच साहित्य संगम नावाचा ब्लॉग सुरु झाला. ह्या ब्लॉग विविध विषयांवर लिहून अगदी मनोसक्त व्यक्त होत असते.
एम.ए. झाल्यावर aptitude test, करिअर मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन असे सर्व चालू होते. पण त्यात ही कोणत्या तरी एका गोष्टीवर एकाग्र होऊन काम करावे असे वाटू लागले. मग वैवाहिक समुपदेशनाच्या ह्या स्पेशल कोर्ससाठी थेट भारती विद्यापीठ गाठले. ह्या कोर्स मध्ये पण तोंडीं परीक्षा, लेखी परीक्षा, रोल प्ले आणि केस सादरीकरण असे सर्व काही होते. जवळजवळ ४७ लोकांनी प्रवेश घेतला होता. त्यात यशस्वी होऊन मेडल मिळाले. त्यातही वयानुसार झालेली गंमत म्हणजे मेन नोट्स ज्यामध्ये होत्या त्याविषयी मी पूर्णपणे विसरून गेले. मग काय संपूर्ण पेपर मनाने लिहिला. तसे बघायला गेले तर हा कोर्स आणि मिळालेले मेडल ही  काही फार मोठी घटना आहे असे अजिबात नाही. पण आपण आपल्यातल्या कमतरतांवर मिळवलेला विजय आपल्यासाठी खूप मोठा असतो. सामाजिक दृष्ट्या भलेही मी काही कोणी मोठी व्यक्ती नसेल, पण माझ्या नजरेत मी मोठी झाले आहे याचा खरं तर हा आनंद आहे.
अशा प्रकारे एकेका कोशातून हळूहळू मुक्त होत मी माझा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून जोमाने कामाला सुरवात केली आहे.आता स्वतःच्या  संसाराचे मार्गक्रमण करताना विवाहपूर्व-वैवाहिक आणि कौटुंबिक समुपदेशनातून  इतरांना मदत करणे सुरु आहे.माझ्या या सर्व प्रवासात माझ्या सर्व भासी आभासी जगातील हितचिंतकांचे माझ्या सोबत असणे माझ्यासाठी खूप महत्वाचे असल्याने ही मेडलची गोड बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर केली.
थोडक्यात काय तर आपणच आपल्याभोवतीचे पक्के केलेले न्युनगंडाचे कोष स्वतःलाच शोधावे लागतात. कोश सापडले की त्यातून मुक्त होण्याचा मार्गही आपोआप गवसतो. ह्या कोशांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या आयुष्याला केंव्हाही वेढा घालून आयुष्यात गुंता निर्माण करत असतात. कधी कधी असेही होते की शाळा- महाविद्यालयात खूप नाव कमवणारे पुढे अचानक आत्मविश्वास हरवून बसतात. त्यांच्यात स्वतः विषयी न्युनगंड निर्माण होतो. त्यामुळे जेव्हा असे वाटत असेल तेव्हा प्रथम स्वतःचा अभ्यास करावा आणि कोशांचे आवरण काढायला सुरवात करावी.
हे सर्व कोश काढण्यात जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा आपोआप स्वतःभोवती एक वलय निर्माण होऊ लागते. हे वलय आपल्या स्वतःला  आनंद, उत्साह आणि प्रेरणा तर देतेच, पण इतरानाही ते दिसू लागते  किंवा त्याची जाणीव होते. मग ते वलयच आपली आपल्याशी आणि सर्व जगाशी ओळख निर्माण करत असते. फक्त त्यासाठी आपण स्वतःला कोशमुक्त ठेवले पाहिजे.
 मला मिळालेल्या ह्या मेडल ने मी कोषमुक्त झाल्याचे सिध्द केले आहे. त्यामुळे त्याचा मला अगदी मनापसून खूप आनंद झाला आणि हा आनंद सर्वांबरोबर शेअर करून तो मी कैकपटीने वाढवत आहे. आता कोश मुक्त्ततेतून वलयांकित  होणाऱ्या माझ्या जीवन प्रवासाला तुमच्या शुभेच्छा तर हव्यातच.

@ - Manjusha Deshpande, Pune.








Sunday, 1 December 2019

माझा बबड्या


त्या अग्गंबाई मधील बबड्यामुळे माझ्या डोक्यात वेगळाच किडा वळवळू लागला. तो बबड्या शब्दच  खूप गोड वाटू लागला. अरे यार, आपल्यालाही कोणीतरी बबड्या म्हणावे असे उगीचच वाटू लागले. पण आपल्याला असे बबड्या म्हणणारे कोणी उरलेच नाही. अर्थात आता पन्नाशीत अशी अपेक्षा करणे कोणाला हास्यास्पद वाटू शकेल. पण वाटले त्याला काय करणार. त्या बबड्याने मला अस्वस्थ केले हे खरं!!! मालिकेतील तो बबड्या कसा आहे ह्याच्याशी मला काही घेणेदेणे नव्हते. 
बरं हा वयाचा बुरखा कोणाला कसे सांगणार होता की मला बबड्या म्हण ना...नाहीतर राजा, सोन्या, राणी, बेटा असे काहीही चालेल.....छे, हे वय ना जिथे तिथे नडतं!!!
खरं तर वय हा फॅक्टर शरीराशी संबंधित आहे. लहानपण...तरुणपण...मोठेपण.. ह्या सर्व शारीरिक अवस्था आहेत. मन कसे कायम चिरतरुण असते. पण शारीरिक वय वाढले की ते वय नकळत मनावर लादले जाते. आपण त्या मनालाही उगीच सो कॉल्ड मॅच्युअर्ड करत मोठेपणाच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. पण त्या बबड्या नावाने माझ्यातल्या बालीश मनाला जागे केले आणि लाडिक हाक ऐकायला कान आसुसले. पण आई-वडील नसताना तर ही हाक ऐकणे मुश्किलच होते. अशावेळी आत्याची पण खूप आठवण झाली. कायम राजा, बेटा म्हणणार्‍या माझ्या आत्यानेदेखील या जगाचा निरोप घेतला. काय करावे कळत नव्हते.
मग एकदम क्लिक झाले की अरे आम्ही मैत्रिणी तर जवळपास सारख्याच वयाच्या आहोत. चला तर आता निदान ग्रुप मध्ये तरी जाहिर करावे की आपण आता एकमेकींना मस्तपैकी सोनू, मोनू, बेटा, रानी, राजा आणि बबड्या म्हणायचे. पुरे झाला आता तो मोठेपणाचा आव. कल्पनेनेच मन अगदी हलकेफुलके झाले. पण आम्ही सर्व मैत्रिणी तर महिन्यातून एकदाच भेटतो. मग काय महिन्यातून एकदाच बबड्या??? नॉट फेयर...काय करावे सुचत नव्हते. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला.
अचानक एक भन्नाट कल्पना सुचली. अर्थात ही फक्त आपल्यातच ठेवा हं. जगभर सांगू नका...नाही तर सगळे टिंगल करतील. तर ती कल्पना अशी आहे की आपणच आपल्याशी लाडाने बोललो तर?....
काय बरे म्हणावे???....शेवटी त्या अग्गोबाईचा प्रभाव वरचढ झाला आणि बबड्या म्हणायचे पक्के ठरले.
मग काय अंगात उत्साह संचारला आणि कल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू केले. पण सुरूवातीस स्वतःला बबड्या बबड्या म्हणणे वेगळेच वाटायचे. मग काही दिवस आयुष्यातील सर्व मोठया व्यक्तींचे स्मरण करत त्यांच्यावतीने  स्वतःला बबड्या म्हणायला लागले. हळूहळू मीच मला लाडिक हाक द्यायला शिकले. काय मस्त अनुभव येतो ....पण परत सांगते ...नो बोभाटा...फक्त आपल्यातच ठेवायचे बरं हे सिक्रेट...प्रॉमिस ना?.. तर माझा गुपचुप गुपचुप बबड्याचा प्रयोग सुरू झाला. काय आश्चर्य शरीराच्या कुरबुरी कमी होऊ लागल्या. सकाळी उठावेसे वाटायचे नाही. चांगली सात तासांची झोपदेखील पुरेसी नसायची. खूप थकले आहे म्हणून लवकर उठायचेच नाही. मग एकदा सकाळचे सात वाजून गेले की व्यायाम, फिरणे बंद आणि स्वयंपाक घरात कामे सुरू. आपण चुकतो आहोत, हे वागणे एक दिवस फार महागात पडेल असे रोज स्वतःला रागवायची. पण मनावर कसलाही परिणाम होत नव्हता. पण प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी आसुसलेल्या मनाला बबड्या संबोधलेले खूप आवडले. सकाळी सकाळी शरीराला जाग आल्यावर जे झोप झोप म्हणणारे मन असते ना त्याची मनधरणी करायला सुरुवात केली. त्याला रोज म्हणावे लागते," बबड्या, ए बबड्या, उठ ना आता, आपले आरोग्य चांगले ठेवायचे आहे ना? की जायचे आहे परत आय.सी.यू.मध्ये? शहाणा आहेस ना तू? मग चल आवर बरं लवकर. बबड्या, तुला अजून एक गोष्ट सांगते, तू वॉक करताना ती जुनी गाणी, प्रवचन, कथा वगैरे ऐकतेस ना तर त्याऐवजी तू मस्त झिंगाट गाणी लावून चालून बघ. कसं असतं की गाण्याच्या गतीप्रमाणे आपण चालतो. त्यामुळे तुला फास्ट चालण्याची सवय होईपर्यंत तरी तू हा प्रयोग करून बघ. उठ बरं आता, आपल्याला तब्येत चांगली ठेवायची आहे ना? माहिती आहे सोन्या, तू सर्व कामे करून थकून जातेस. पण चालणेही आवश्यक आहे ना? तुझी तब्येत तुलाच सांभाळावी लागणार आहे ना?”
आईशपथ, रोज एवढं प्रेमाने आजवर कोणी बोलल्याचे आठवत नाही. मग काय मस्तपैकी कानांत ईयर फोन, पायात बूट घालून अस्मादिक वॉकिंगला तयार!!! आजवर,” ही काय गाणी आहेत का? काही अर्थ तरी आहे का ह्या गाण्यांना?” असे म्हणणारी मी आता मस्तपैकी झिंगाट गाण्यांवर ठेका धरत अशा काही स्पीडने चालते की झिंग येऊन पडायचीच बाकी राहते. एवढं दमून भागून घरी आल्यावर थोडी विश्रांती तर हवीच असते. पण सकाळची कामे डोळ्यांसमोर येतात आणि तशीच किचन मध्ये जाऊ लागते. पण तिथेही मनाला सांगावे लागते,” अरे, बबड्या, एक पाच मिनिटे तर बस ना. किती दमली आहेस तू. थोडे निवांत बसून पाणी तरी पी आणि मग लाग कामाला.”
काय छान वाटते म्हणून सांगू.....आपणच आपली काळजी घ्यायची......कशाला पाहिजे कोण......मग मस्तपैकी पाच मिनिटे बसून सावकाश पाणी प्यायले आणि अगदी फ्रेश मूडमध्ये कामाला लागले.
ही बबड्याची जादू खूप ठिकाणी उपयोगात येऊ लागली. शरीराचे बरेचसे नखरे ह्या मनरूपी बबड्याने कमी केले.
कोणत्याही गोष्टीचा कंटाळा आला असेल तर थोडे बबड्या ...बबड्या ....करून कामे करून घेता येतात. अर्थात कंटाळा शब्दाला आयुष्यातून घालवणे काही सोपा टास्क नसतो. कारण ह्या कंटाळ्यावर शारीरिक कुरबुरी, थकवा अशी विविध भरभक्कम आवरणे असतात. सुखाने ऐसपैस पसरलेल्या देहाची ही आवरणे ओरडून किंवा ओरबाडून निघणे अवघड असते. म्हणून मग मी आपले बबड्याला हाताशी धरले.
आज कामवाली बाई नाही आली.....लगेच मूड जायला नको.....मग आज बबड्याला थोडे जास्त काम पडणार...पण.....बबड्या करून टाकणार. दुपारी खूप झोप येते ना? पण बाबू डॉक्टरांनी दुपारी झोपायला नाही संगितले ना?...मग तू असे कर खुर्चीतच वामकुक्षी घे. काय म्हणतेस लिहिण्याचा कंटाळा आला??? सोन्या, लिही ना पटकन....ऐकणार ना तू...लिहून व्यक्त होणे आवडते ना तुला मग का ग असा कंटाळा करतेस तू सोनू....लिही बरं आता लगेच...
इट्स वर्कड!!!! काय आश्चर्य, माझे सुस्तावलेले शरीर एकदम ताजेतवाने झाले आणि अगदी अर्ध्या तासात किचनला रामराम ठोकून मी अगदी शहाण्या बाळासारखी लिहायला बसले. बबड्या शब्दात एवढे वजन असेल असे अग्गंबाई चा बबड्या बघून तर अजिबात वाटले नव्हते. गंमत म्हणजे आपण आपल्याला बबड्या म्हटलेले कोणाला कळत देखील नाही. तेरी भी चूप...मेरी भी चूप.
विश्वास नाही बसत??? मग करूनच बघा.
खरेतर व्यक्ती नोकरी करणारी असो वा घरीच असो, पण रोज रोज त्याच त्याच साचेबद्ध जीवनाचा तिला कंटाळा येतो. मग अशावेळी सोन्या, राजा, बबड्या हे वरवर साधे वाटणारे शब्दही स्वयं-प्रेरणा ( self-motivation) देतात. देव जसा भावाचा भुकेला तसे मन प्रेमाचे भुकेले असते. म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी मनोबोधात मनाला सज्जन संबोधत उपदेश केला आहे. मना सज्जनाच्या ऐवजी आपण आता अधिक प्रेमाने मनाला बबड्या, सोन्या, राजा वगैरे म्हणून त्या चंचल मनाला स्थिर करू या.
कोणावर चिडलो, ओरडलो किंवा कमी लेखले तर तो आपली कामे मनापासून करेल का??? नाही ना.....तसेच आपले स्वत:चे देखील असते. आपले काम काढून घ्यायचे असेल तर जिभेवर साखर ठेवावी म्हणतात. मग ही साखरपेरणी स्वतःच्या बाबतीतपण नको का??? आपण जर आधी स्वतःशी गोड बोलू शकलो तर इतरांशी देखील बोलू शकू असे मला वाटते. हं, पण नेहमीच सतत गोड बोलून चालत नाही. कधी कधी रात्री व्हाट्सअप वर मन जास्तच रेंगाळू लागले तर थोडे दटावणीच्या सुरात सांगावे लागते,” नो बबड्या नो.....किती वाजले बघ बरं आता.....झोप बघू लवकर ......उद्या वॉकिंगला उठायचे आहे ना ....झोपा मग आता, आणि हो, ठरवल्याप्रमाणे दिवसभरात काय काय चांगले-वाईट घडले आणि काय काय चांगली कामे केली, काय चुका झाल्या....सर्व लिहिल्याशिवाय झोपायचे नाही हं.
नाही म्हटले तरी माझ्यात झालेला बदल घरात झेपणारा नव्हता. असे काय घडले की ही एवढी मोटीवेटेड झाली हे कोणालाच कळत नव्हते. सकाळी सकाळी लिहिताना पाहून जो तो टोकट होता,” आज काय विशेष सकाळीच लिहायला बसलीस.” आता त्यांना कसे सांगणार ना की माझ्या बबड्याने बसवले आहे. फुल्ली सीक्रेट आहे बाबा हे ....कळायला नको हं .....नाही तर सर्व माला बबड्या बबड्या करून चिडवतील.
शेवटी एवढच सांगेन,
                  मन शहाणं शहाणं
                  गोड शब्दांचं भुकेलं
                  नका करू गार्हाण
                  गोंजारा त्याला प्रेमानं
तर असेच कोणीतरी सोन्या, बबड्या तुमच्याही आयुष्यात येवोत हीच शुभेच्छा!!!!
@ मंजुषा देशपांडे, पुणे.